निसर्ग व माणूस समतोल का ढासळत आहे ? - पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ
------------------------------------------------------------------------------------------------------------------
मानव व
सजीव,निर्जीव सृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले
आहे.या एकुलत्या एक पृथ्वी शिवाय सजीव,निर्जीव सृष्टीला टिकण्यासाठी कोणताही
ग्रह सुयोग्य नाही.निसर्गाचा फक्त वापर करण्याचे राजकीय अर्थशास्त्राचे धोरण
भांडवली व साम्यवादी अर्थव्यवस्थेने स्वीकारल्याने प्रचंड जंगल तोड आणि निसर्ग
संपत्तीचा बेबंद विनाश आजपर्यंत सुरु आहे.त्याचा परिणाम जागतिक तापमानवाढ(Global Warming) होण्यात
झाला.त्यामुळे हिमनद्या वेगाने वितळत आहेत त्यामुळे समुद्राची पातळी वाढून समुद्र
किनाऱ्यावरील शहरे बुडण्याचा धोका निर्माणझाला.हवामानात प्रचंड गतीने बदल झालेत ( Climate Change) त्याच्या
परिणामी पूर,दुष्काळ,वादळाचे संकट तयार झाले.अति-उष्ण
उन्हाळा,अति - थंड हिवाळा असा अनुभव येत
आहे.निसर्गाशी जुळवून घेण्यासाठी मानवेतर सजीव सृष्टीला जैविक उत्क्रांतीवर
अवलंबून रहावे लागते आणि ही प्रक्रिया अत्यंत संथ म्हणजे लाखो वर्षांची असते.मात्र
माणसाने त्याला मिळालेल्या मेंदूच्या बळावर जैविक उत्क्रांतीवर
अवलंबून न राहता आपल्या स्वतंत्र प्रज्ञेच्या आधारे निसर्गाला
हवे तसे वाकवायला सुरवात केली. निसर्ग स्थितीला शरण न जाता अंगभूत असणाऱ्या चौकस
बुद्धीचा वापर करून त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञान जन्माला घातले आणि निसर्गावर
ताबा मिळवण्याचा वृथा अभिमान जोपासू लागला.मात्र सजीव व निर्जीव सृष्टी आणि मानव
यांचे सहसंबंध,सहअस्तित्व यांचे महत्व त्याने दुर्लक्षित
केले.निसर्ग नियमांची पायमल्ली केली विज्ञान तंत्रज्ञानाचा विकासा होत असतांना
त्याचा उपयोग नव्याने जन्माला आलेल्या उद्योजक भांडवलशाहीने केला.या औद्योगिक
क्रांतीमुळे प्रचंड गतीने नफा मिळवण्यासाठी निसर्ग संपत्तीला वेठीस धरले. परिणामी
निसर्गाचा समतोल बिघडला आणि माणूस व सारी सृष्टी संकटात आली.बिघडलेल्या
निसर्गाच्या समतोलास निसर्गावर मात करण्याचा वृथा अभिमान बाळगणारी
पण निसर्गाचा हा ऱ्हास होण्यास केवळ मानवी बुद्धीच कारणीभूत
नसून निसर्ग नियम बाजूला सारून ही संपत्ती फक्त कच्चा माल म्हणून वापर करण्याच्या
दृष्टिकोनावर आधारलेली नफेखोर भांडवली अर्थव्यवस्था कारणीभूत आहे हे आपण लक्षात
घेतले पाहिजे.ते लक्षात न घेता आहे त्या व्यवस्थेत निसर्ग संवर्धनाचे उपाय व
उपक्रम हाती घेतले जातील पण समस्या मात्र सुटणार नाही.कारण या आधी असे संवर्धनाचे
उपाय व उपक्रम सुचविणाऱ्या गाडगीळ समितीच्या शिफारशी आणि प्यारीस करारातील तरतुदी
बासनात गुंडाळण्यात आल्या.सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतले पाहिजे की विज्ञान
तंत्रज्ञान नाकारून चालणार नाही तर निसर्ग संवर्धनासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे.
आज नफेखोरीने आणि युद्धखोरीने ही एकुलती एक जीवसृष्टी असलेली पृथ्वी विनाशाच्या
मार्गावर आहे.या पृथ्वीचे अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गाचा फक्त वापर करण्याचे
धोरण सोडून निसर्ग व मानव यांचा समतोल साधणारे नवे समन्यायी,पर्यायी
विकासनीतीचे राजकीय अर्थशास्त्र स्वीकारावे लागेल. तरच ही हरीभरी वसुंधरा वाचू
शकेल.नफ्यासाठी निसर्ग ओरबाडणाऱ्या उत्पादकांनाजागतिक तापमानवाढ व हवामानबदलाच्या
संकटाची जाणीव होत आहे. त्यामुळे हरित-वायू उत्सर्जनावर उपाय करण्यासाठी
१९९७ साली क्योटो प्रोटोकॉलकरार त्याचबरोबर २०१५ साली असाच करार करण्यात आला व
कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात ते ठरविण्यात आले.मात्र त्याची
अमलबजावणी एकही देश करतांना दिसत नाही. जागतिक तापमानवाढ व हवामानबदलाचे परिणाम एक
पक्षीमित्र म्हणून आम्ही रोज अनुभवत आहोत.निसर्ग संपत्ती व जंगल नष्ट होण्यामुळे
आज काही पक्ष्यांच्याच नव्हे तर प्राणी,वनस्पती,फुलपाखर यांच्या अनेकजाती नष्ट झाल्यात
काही अति संकटात आहेत तर काही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.आजतरी
निसर्ग रक्षणाची विकासनीतीची ब्लूप्रींट आपल्या जवळ नाही.त्यामुळे आहे या स्थितीत
निसर्ग रक्षणासाठी कोणते उपाय करता येतील याचाविचार,पक्षी,प्राणी,वनस्पती,फुलपाखर मित्रांनी,पर्यावरणवादी
मित्रांनी करण्याची गरज आहे.